कोरची तालुक्यात आरोग्य विभागाचा खेळखंडोबा. 

रस्त्यावरच्या खड्यात 108 ची गाडी गेली अन् लताची डिलीवरी झाली. 

 

कोरची.

कोटगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधून रेफर केलेल्या डिलीवरी च्या पेशंटला कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन येत असतांना बेतकाठी ते पांढरीगोटा च्या दरम्यान असलेल्या डोंगरावर, खाचखळगे असलेल्या रस्त्याने येत असतांना जशी 108 ची गाडी खड्यात गेली तशीच बाईची डिलीवरी झाली.

 

सविस्तर वृत्त असे आहे की,आज दु. 11.30 च्या दरम्यान कोरची तालुक्यातील देऊळभट्टी ( पाटील टोला) येथील रहिवासी सौ. लता मुकेश कोरेटी (29) हिला डिलीवरी च्या कळा आल्या. 8 महीन्याचा बाळ पोटात होता. त्यामुळे डिलीवरीला वेळ आहे म्हणून घरची लोक बिनधास्त होती.

अचानक कळा आल्याने तिथून 2 किमी अंतरावर असलेल्या कोटगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लागलीच घेऊन आले.

 

तेथील डॉ. चौधरी आणि महिला डॉ. नाकाडे यांनी तपासणी केली आणि रोग्याला तात्काळ गडचिरोली च्या जिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. रेफर स्लीप क्रमांक 1120 दि. 15/5/2024 वेळ दुपारी 1.00.

गडचिरोली ला पेशन्टला घेऊन जाण्यासाठी 108 क्रमांकाच्या गाडीला बोलाविण्यात आले.गाडी सोबत महिला डॉक्टर किंवा नर्स किंवा आशा वर्कर राहणे अत्यंत आवश्यक असतांना डॉ. चौधरी आणि डॉ. नाकाडे यांनी कुणालाही सोबत पाठविले नाही.

 

108 च्या गाडीत डॉ. आतीश सरकार होते. सोबत लताचा पती मुकेश, तिचे नातेवाईक गिरजा कोरेटी ( माजी सरपंच) ईलेश्वरी नैताम होते.

 

पेशन्टची अवस्था पाहता,कोटगुल वरून गडचिरोली ला पेशन्टला न नेता डॉ.सरकारने पेशन्टला कोरची येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्याचे ठरविले. कारण कोटगुल ते गडचिरोली हा अंतर 140 किमी असून कोटगुल ते कोरची हा अंतर 25 किमी आहे.

कोटगुल वरून येत असतांना कोरची वरून 8 किमी अंतरावर, बेतकाठी ते पांढरीगोटा दरम्यान असलेल्या डोंगरावर जशी गाडी खड्यात गेली तशीच चालत्या गाडीतच बाईची डिलीवरी झाली. सोबत असलेल्या नातेवाईकांना शंका आली त्यामुळे त्यांनी गाडी थांबविली व बाईच्या पोटाला हात लावून तपासणी केली तेव्हा डिलीवरी झाली होती. बाळ बाईच्या साडीतच होता त्यामुळे त्यांना दिसला नाही.

 

तिथे असलेले डॉ. सरकार यांनी प्राथमिक उपचार करून लगेच गाडी कोरची ला घेऊन आले. कोरची येथील

ग्रामीण रुग्णालयात बाळ व आईला भरती करण्यात आले. येथे बाळ व आई सुखरूप असून बाळ 8 महीन्याचे आहे व वजन 2.00 किलो आहे.नशीब बलवत्तर होते म्हणून पहिल्या खेपेतील बाळंत नार्मल झाले. परंतु आरोग्य विभागाच्या खेळखंडोबा मुळे बाळ व आई दोघांनाही धोका होता.

 

 

माता-बाल संगोपन आणि माता मृत्यू व बाल मृत्यू रोखण्यासाठी बऱ्याच गावात दवाखाने आहेत.

देऊळभट्टी वरून एक किमी अंतरावरील नांगपूर येथे सुध्दा आयुष्यात भारत योजनेअंतर्गत दवाखाना आहे. या ठिकाणी सौ. प्रतिभा कोडवते या नर्सची नियुक्ती आहे. परंतु ह्या कधीही दवाखाना उघडला नाही असे पेशन्टच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे या परिसरातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही.

मागील आठ दिवसाआधी पत्ताफडी सुरू झाली आहे. त्यामुळे गावातील आशा वर्कर सौ. मनुला उसेंडी या पत्ता तोडण्यात व्यस्त आहेत त्यामुळे ते पेशन्टकडे जाऊन चौकशी केली नाही.

 

आशा वर्कर खाजगी कामात व्यस्त आहेत. आयुष्यात भारत योजनेचा दवाखाना कित्येक दिवसापासून बंद आहे. नर्स सौ. प्रतिभा कोडवते सतत गैरहजर आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगुल येथील डॉ. चौधरी व महिला डॉ. नाकाडे हे पेशन्टची तपासणी करून वाळ एक किलोचे असून पेशन्टची अवस्था नाजूक आहे. असे सांगून आपली जबाबदारी झटकण्याचे काम करीत आहेत.ातुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मडावी यांचेशी संपर्क होऊ शकला नाही. तरीही तालुक्यात मागील दोन वर्षापासून आरोग्य विभागाची स्थिती पाहता आरोग्य विभागच सलाईनवर आहे की काय अशी परिस्थिती आहे.

ही स्थिती फक्त कोटगुल परिसराची नाही तर संपूर्ण तालुक्यात आहे.

या तालुक्यात सक्षम नेता नाही. अधिकारी नाही. जिल्हा मुख्यालयापासून हा तालुका 120 किमी अंतरावर, डोंगर दऱ्यात, अतिसंवेदनशील नक्षल परिसरात आहे. त्यामुळे सर्वच लोक या तालुक्याकडे कानाडोळा का करतात हा यक्षप्रश्न आहे.