गडचिरोली जिल्ह्यातील ग्राम विज सेवकांना पुनर्नियुक्ती द्या.  आमदार कृष्णा गजबे यांची राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री गडचिरोली जिल्हा नामदार देवेंद्रजी फडणवीस यांचा कडे मागणी.

देसाईगंज:- गडचिरोली जिल्ह्यात पेसा अंतर्गत सन २०१६-१७ पासून २०२१-२२ पर्यंत ग्राम विज सेवकांना १ दिवसाचा खंड देवुन ग्राम पंचायत परिसरात उद्भवणाऱ्या विज पुरवठ्यातील दुरुस्ती करण्यासाठी १५६ बेरोजगार युवकांना नियुक्ती देण्यात आली होती. परंतु महाराष्ट्र राज्य विज नियामक आयोगाच्या आदेशानुसार सदर कालावधी ५ वर्षाचा असल्याने सन २०२२-२३ या वर्षी महावितरण कंपनी कडून त्यांना पुनर्नियुक्ती देण्यात आली नाही. त्यामुळे १५६ यूवकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांनी गडचिरोली येथील अधिक्षक अभियंता, महावितरण कंपनी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले आहे. आमदार कृष्णा गजबे यांनी या आंदोलन कर्त्यांची गंभीर दखल घेत त्यांच्या प्राप्त निवेदनावरुन मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री गडचिरोली जिल्हा नामदार देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेतली व त्यांना घटनेचे गांभीर्य लक्षात आणुन दिले व तातडीने गडचिरोली जिल्ह्याच्या पेसा अंतर्गत १५६ ग्राम विज सेवकांना पुनर्नियुक्ती देण्याची व त्यांच्या अन्य मागण्या मान्य करण्याची मागणी केली. त्यावर उपमुख्यमंत्री महोदयांनी प्रधान सचिव उर्जा व व्यवस्थापकीय संचालक महावितरण कंपनी यांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर आमदार कृष्णा गजबे यांनी व्यवस्थापकीय संचालक महावितरण कंपनी यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता त्यांनी सदर प्रकरणी कारवाई सुरू असुन महाराष्ट्र राज्य विज नियामक आयोगाची मंजुरी मिळताच गडचिरोली जिल्ह्यातील ग्राम विज सेवकांना पुनर्नियुक्ती देण्यात येईल तसेच त्यांच्या अन्य मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे सांगितले. त्यामुळे आंदोलनकर्त्या ग्राम विज सेवकांनी आपले आंदोलन मागे घ्यावे असे आमदार कृष्णा गजबे यांनी अवाहन केलेले आहे.